Thursday 29 December 2011

व्यायामाचा श्रीगणेशा

व्यायामाचा श्रीगणेशा करताना धसमुसळेपणा उपयोगाचा नाही. यामुळे आपण स्वत:च शारीरिक तक्रारींना आयतंच आमंत्रण देतो.

नियमितपणे व्यायामाला सुरुवात करताना घाई करून चालत नाही. शारीरिक क्षमतेला अनुसरून व्यायामाचे प्रकार, त्याचे प्रमाण आणि वेळा ठरवाव्या लागतात. व्यायामाचा श्रीगणेशा करताना अति तेथे माती, हे लक्षात ठेवावं. सध्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेला झेपेल इतकाच व्यायाम करणं गरजेचं आहे. एकदा का सवय झाली तर हळूहळू त्याचं प्रमाण आणि वेळ वाढवायला हरकत नाही. असं केल्यानेच व्यायाम परिणामकारक ठरतो अन्यथा, दुखापतींना आयतंच आमंत्रण मिळतं.

किती वेळा?
आठवड्यातून तीन ते पाच वेळा ३० ते ६० मिनिटं व्यायाम करावा. व्यायाम करताना वय, फिटनेस लेव्हल आणि मेडिकल हिस्ट्री ध्यानात घ्यावी.

टेक्निक सांभाळा
विशिष्ट व्यायामप्रकाराचं टेक्निक ठरलेलं असतं. ते त्याच पद्धतीने झाले पाहिजेत. वेट्स, क्रंचेस, सीटअप्स करताना घाई किंवा धसमुसळेपणा करून उपयोगाचं नाही. अन्यथा कायमची सांधेदुखी किंवा इण्टर्नल इन्जुरी होण्याची दाट शक्यता असते.

व्यवस्थित श्वास घ्या
वर्कआऊट करताना व्यवस्थित श्वासोच्छ्वास होणं खूप गरजेचं आहे. वेट्स किंवा योगा करताना ही क्रिया योग्यरित्या झाली पाहिजे. जसं, वेट्स वर उचलताना श्वास आत घ्यावा आणि मसल्स रिलॅक्स करताना श्वास बाहेर सोडावा.

स्ट्रेचिंग करा
पूर्ण व्यायाम करून झाल्यानंतर लगेचच स्ट्रेचिंगने मसल्स सैल करावेत. यामुळे सांध्याना ताठरपणा न येता शरीर लवचिक होण्यास मदत होते.

भरपूर पाणी प्या
व्यायाम करताना घामावाटे शरीरातलं पाणी संपत असतं. डीहायड्रेशन टाळण्यासाठी व्यायामप्रकारादरम्यान थोडंथोडं पाणी प्यावं. भरपूर पाणी पिऊन रनिंग किंवा हेव्ही एक्ससाइज करण्याच्या भानगडीत पडू नका.

आराम करा
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यायामाचा फायदा होण्यासाठी स्नायूंना पुरेसा आराम मिळणं गरजेचं आहे. वेट ट्रेनिंगमध्ये ४८ तासांचा गॅप असावा लागतो. वेट ट्रेनिंगमुळे स्नायूंवर येणारा ताण कमी होण्यासाठी इतका कालावधी आवश्यक असतो.

धीराने घ्या
ताटात वाढलेलं एकदम खाऊ शकत नाही, तसंच व्यायामाचं आहे. जलद, कमीत कमी वेळात जास्त व्यायामप्रकार हा फण्डा वर्कआऊट करताना लागू पडत नाही. यामुळे शारीरिक तक्रारींना आयतंच आमंत्रण मिळतं. शरीराला विशेषत: अवयवांना सूट होतील असे व्यायामप्रकार हळूहळू वाढवावेत.

वार्म अप अॅण्ड कूल डाऊन
हेव्ही प्रकारांनी व्यायामाला सुरुवात न करता आधी रनिंग, जॉगिंग किंवा हलक्याशा व्यायामांनी अवयव मोकळे करून घ्या. व्यायाम झाल्यानंतरही पूर्णत: रिलॅक्स व्हा. कोमट पाण्याने आंघोळ केल्यानेही स्नायूंना खूप आराम मिळतो.


SHRIPATI

योगासने आणि रोग निवारण


yogasan

WD
योगासनाने शरीरात उर्जा वाढतेच तसेच ती नियमित केल्याने विविध आजारांवर देखील नियंत्रण ठेवता येते. आजारानुसार त्यांच्यावर उपयोगी आसने खालीलप्रमाणे-
* एसिडीटीसारख्या पित्ताच्या आजारावर शलभासन, नाडी शोधन, शीतळी शितकरी आणि प्लविनी प्राणायामाने फायदा होतो.
* निद्रानाशावर- सर्वांगासन, सूर्यभेदी प्राणायाम, शीतली शीतकरी व योगनिद्रेचा फार फायदा होतो.
* पोटाच्या विकारात सर्वांगासन, बध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन, सर्पासन, चक्रासन, मत्स्येद्रासन, उंटासन व पोटाचे व्यायाम लाभदायी ठरतात.
* कंबरदुखीसाठी- पाठीच्या कण्याचे व्यायाम, योगक्रिया, सुखासन, पद्‍मासन, त्रिकोणासन, उत्कटासन, अर्धमत्स्येद्रासन, गोमुखासन, वज्रासन, सुप्‍तवज्रासन, मत्स्यासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, एकपाद, शंक्खासन, नौकासन गुणकारी आहेत. पाठदुखीवरही या आसनांचा उपयोग होऊ शकतो.
* बध्दकोष्टतेसाठी- शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, चक्रासन, भुजंगासन, अर्धत्स्येद्रासन, उष्टासन, हलासन, सर्वांगासन ही आसने करावीत. अथवा डावी नाकपुडी बंद करून उजवी मोकळी ठेवा. मुलबंध बांधून 100 पावले चाला. (शौचाची क्रिया रोखण्यासाठी स्थिती) किंवा चार ग्लास पाणी पिऊन ताडासन, स्कंधासन, तिर्थक भुजंगासन, शंखासन आदी आसनांच्या दररोज एक एक आवृत्ती कराव्यात
* करपट ढेकरांवर सर्वांगासन, ‍शीर्षासन, जानुशिरासन, भुजंगासन, चक्रासन, बध्दपद्‍मासन, उष्टासन, कर्णपिडासन आदी आसने उपयुक्त आहेत. यापैकी सर्वांगासन व ‍शीर्षासन अधिक लाभदायी आहेत. तात्काळ फायदा होण्यासाठी मत्स्यासन, अर्धमत्स्यासन, उर्ध्वपद्‍माससारख्या आसनांचा अभ्यास करावा.
* कातडीचे विकार दूर करण्यासाठी प्रार्थनेबरोबरच शंखपद्‍मासन व नाडीशोधन करावे.
* मांडी तसेच जांगेतील आजारांसाठी सर्वांगासन, जानुशिरासन, पश्चिमोत्तासन, अर्धमच्छेंद्रासन, सूर्यभेदी प्राणायाम नेतीजलनेती करावी तसेच वरील आसन अधुनमधून करत राहिल्यास सर्दीपासून संरक्षण मिळते.
* सुरकुत्यांवर कर्णी योगमुद्रा, शवासन, योगक्रियांचा उपयोग होतो.
* तीव्र रक्तादाबावर वज्रासन, पवनमुक्तासन, शशांकासनाबरोबर शीतली, शीतकरी आणि भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. शवासनानेही ताण, थकवा दूर झाल्याने रक्त दाब आटोक्यात येतो.
* दमा तसेच श्वासाच्या आजारावर शवासन, मत्स्यासन, शलभासन, सुप्‍तवज्रासन, भुजंगासन, उष्ट्रासन, शंखपक्षालन, भस्त्रिका, कपालभाती, उज्जाई प्राणायाम प्राणप्रयोग यांचा उपयोग होतो.
* नाक, कान व घशाच्या विकारावर सिंहासन, मत्स्यसनाबरोबर जलनेती प्राणायाम व यौगिक क्रिया उपयोगी आहेत.
* जुलाबावर सर्वांगासन, हलासनाबरोबर मुलबंध कार्योत्सर्गँ शितली प्राणायाम करावेत.

ND
* पचनासाठी पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन, उडियानासन, वज्रासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू शकतात.
* पोटदुखीवर उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वज्रासन, मच्छेद्रासन, भुजंगासन, उडियान योगमुद्रा रेचन करावे.
* पायांसाठी पद्‍मवीरासन, पर्वतासन, महावीरासन, अर्धबध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन व योगक्रिया कराव्यात.
* बहिरेपणासाठी- सिंहासन, शीर्षासनाबरोबर भ्रामरी प्राणायाम नेतीक्रिया, यौगिक क्रिया कराव्यात.
* हातासाठी धनुरासन, बकासन, चक्रासन, उर्ध्वपद्‍मासन, हस्तभुजासन, कुक्कुटासन, वज्रासन, लोलासन फार उपयोगी ठरतात.
* मधुमेहासाठी इष्टवंदन, हलासन, सर्वांगासन, जानुशीरासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, अर्धमच्छेंद्रासन, सुप्‍तवज्रासन, शशांकासन, गोमुखासन, ताडासन, योगमुद्रासन, मुलबंध बांधुन भस्त्रिका भ्रामरी नाडी शोधन शीतकरी आणि शितली प्राणायाम करावे.
* जाडेपणा कमी करण्यासाठी धनुरासन, पश्चिमोत्तासऩ सर्वांगासन, त्रिकोणासन, हलासन, शलभासन, अर्धमच्छेंद्रासन, पादहस्तासन, योगमुद्रेबरोबर, उडियान आणि नाडी शोधन प्राणायाम, योगिक क्रिया व मेरूदंडाचे व्यायाम करावे.
* यकृतदोषांवर - पश्चिमोत्तासन, शलभासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन, भुजंगासन, बध्दपद्‍मासन, शशांकासन, हस्तपादोत्तानासन, उष्ट्रासनाबरोबर वीर वंदन किंवा परमेष्टी वंदानाने अधिक लाभ होतात.
* रक्ताच्या कमतरतेवर- सर्वांगासन, हलासन, शलभासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, नाडी शोधन प्राणायाम व शितली प्राणायामाने रक्तशुध्दी व रक्तवृध्दीस लाभ होतो. कमी रक्तदाबावरही योगासनामुळे नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी वज्रासन, योगमुद्रा हकली आसने आणि नाडी शोधन कायोत्सर्ग यासारखी आसने करावीत.
* स्लिपडिस्क - नौकासन, धनुरासन, शलभासन, भुजंगासन व मकरासनाने अधिक लाभ होऊ शकतो.
* सुज आल्यास- शरीरावर सुज आलेल्या भागाच्या आतल्या नसांना ताणणारे प्रकार लाभदायक ठरतात. उर्ध्वसर्वंगासन व शीर्षासन यामुळे सुज येण्याची प्रक्रिया कमी होते.
* तोतरे बोलण्यावर नौकासन, सिंहासन, उत्थितपद्‍मासनाबरोबर शीतकरी, शितली आणि भ्रामरी प्राणायामाने तोतरेपणा कमी होतो.

व्यायाम

http://www.arogyavidya.net/arogyavi/index.php?option=com_content&view=category&id=199&layout=blog&Itemid=215 

व्यायाम म्हणजे आपल्या डोळयासमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहितच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारताताल्या जातिव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी तर खाणा-यांना श्रमच नाही अशी परिस्थिती आहे. धट्टीकट्टी गरिबी म्हणण्याची आपल्यावर पाळी आहे. म्हणूनच व्यायामाचे महत्त्व आहे. व्यायाम केला नाही तर खालील दुष्परिणाम होतात.
- एकूण शारीरिक क्षमता, सहनशक्ती कमी होते. अपेक्षित आयुष्य कमी राहते.
- हृदय लवकर जीर्ण, दुबळे होणे.
- सांधे आखडणे आणि स्नायू दुबळे होणे. या आरोग्य समस्या लवकर उत्पन्न होणे.
- रक्तातली साखर वाढून मधुमेह होणे.
- शरीरात चरबी साठणे, पोट सुटणे, शुध्द रक्तवाहिन्यांत चरबीचे थर साठणे, त्यामुळे रक्तवाहिन्यांत अडथळे होणे.
- भूक व पचनशक्ती मंद होणे.
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील . या सर्व हळूहळू वाढणा-या समस्या असल्याने त्यांची मनुष्याला सवय होऊन जाते. व्यायाम न करणेही अंगवळणी पडते. अनेकजण या आळसाचे समर्थन करतात. व्यायामाची आवड लहानपणापासूनच लावली पाहिजे. प्रत्येकाने काही ना काही व्यायाम आयुष्यभर नियमित करायला पाहिजे.
व्यायाम म्हणजे नेमके काय हेही समजायला पाहिजे. केवळ थोडेफार चालणे यालाच अनेकजण व्यायाम समजतात. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. सर्व दृष्टीने फायदेशीर होईल असे व्यायाम शोधून ते चिकाटीने नियमित करणे आवश्यक आहे. व्यायामाचे शास्त्र नीट समजावून घेण्यासाठी हे प्रकरण उपयोगी पडेल.

Thursday 22 December 2011

माझी आई

माझी आई

भारतीय संस्कृतीमध्ये आईविषयीची थोरवी `मातृदेवो भव' अशीच आहे. स्वत:च्या उदरात नऊ महिने पोसलेला जीव जन्माला घालतानाच्या आईच्या वेदना समजून घेणारे विरळाच. आई म्हणजे त्यागमूर्ती असंच तिचं रूप परंपरेनं आपल्यापुढे येतं; पण या उदात्तीकरणाच्या प्रतिमेमुळं आईमधलं माणूसपण हिरावलं जातं का? याकडे डोळसपणे बघण्याची वेळ आता आली आहे. आई आत्मनिर्भर असेल तर निश्चितच पुढची पिढी कणखर, जबाबदारीचं भान असणारी होईल. मातृदिनानिमित्त संजय संगवई, माधव गवाणकर आणि डॉ. अभिजित वझे यांचं आईबरोबरचं नातं उलगडण्याचा प्रयत्न सोबतच्या लेखांमधून दिसून येतो.
लहानपणी गावाकडे स्त्रियांचं दबलेपण पाहिलं तसं आपलं कुटुंब, मुलं, घर नीटनेटकं ठेवणं, त्यावर नियंत्रण ठेवणं, किंवा नीटनेटकं न राहता कह्यात मात्र ठेवणं इत्यादी अनेक प्रकार पाहत आलो. घरच्या बाईचा स्वभाव व क्षमतेनुसार नवऱ्यासहित मुलांना, घरच्या व्यवस्थापनाला व बाहेरच्या संबंधांना (परराष्ट्न् व्यवहार!) आकार मिळतो ते पाहत आलो. आमच्या बिरादरीतल्या आज्यांपासून मामी-मावशींपर्यंतची कुटुंबही त्यांच्या नावानं (ही) ओळखली जात आली. पुरुषमाणसं जरा दबूनच. पुरुष म्हणून ते बायकोला पिचतच मारतीलही; पण कर्तव्यशून्य! घरासंबंधी निर्णय व व्यवस्थापन हा बायांचाच प्रांत असायचा. अर्थात, अंतिमत: पुरुषाचा (नवरा, मुलगा, जावई) निर्णय महत्त्वाचा असला तरी बाईची इच्छा व आग्रह (तगादा!) हा निर्णायक राहत आला. तसं नसतं तर अमुक घर उभं केलं/ बरबाद केलं हे पुरुष व स्त्रियांच्या बाबतीतही म्हटलं का जातं?
आईच्या वाढविण्याच्या पद्धतीनुसार, स्वभावानुसार मुलं घडतात, बिघडतात हे सतत दिसताना त्या-त्या स्त्रियांचं काही करणं, न करणं, अक्षम असणं, त्यांना दाबणं, त्यांनी पुढे येऊन करवून घेणं किंवा हवं तसं वाढू देणं (पूर्वीचं, आजचं नव्हे!) हे सर्वच त्याज्य कुटुंबाच्या व माणसांच्या- पुरुष व स्त्रियांच्या-आयुष्यात व एकंदर जगण्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे दिसत होतं. माझे अनेक आजोबा, काका, मामा समजूतदार होतेच, बाई जर स्वत: ठणकावून (रीीशीींर्ळींशश्रू) निर्णय घेत असेल तर ते मानायचे. पारंपरिक म्हणजे सगळं वाईट असं नाही. आपणच तेवढे विचार करणारे व मागची पिढी `मागास', पुढची पिढी भिकार हा आत्मगौरव किंवा स्वसंरक्षणाचा मार्ग झाला. असो.
पुरुष म्हणून घडताना कुटुंबाच्या स्तरावर बाईची भूमिका किती कळीची असते, जर तिने ठणकावून निर्णय घेतले, तर बाकी परिस्थिती ही देखील बदलते हे जसं दिसत होतं, तसं एक व्यक्ती किती निर्मितीक्षम सर्जनशील असते, आपल्या घरचं किंवा आसपासचं वातावरण ती कसं बदलते हे माझ्या आईकडे दूरस्थपणे पाहताना जाणवतं. एक स्त्री म्हणून व विशिष्ट परिस्थितीमुळे झालेली मानहानी, अगदी जवळच्या तसेच पोटच्या गोळयांकडून या म्हाताऱ्या अवस्थेपर्यंतही मिळणारी अपमानास्पद हिडिस-फिडीस, तुच्छता या सगळयांना पचवीत ही बाई एकटी गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ खंबीरपणे उभी आहे. केवळ उभी नाही तर तिनं एक उत्तम घर उभं केलं आहे. समाजात स्थान मिळवलं आहे अन् माणसं सांभाळली आहेत, त्यांच्यासाठी केलं आहे. यापैकी एकही गोष्ट माझ्यात नाही.
ती म्हणते, हे सर्व तिच्या आईकडून तिला मिळालं. जगण्यातला नीट-नेटकेपणा, स्वच्छता, स्वयंपाकापासून घर, कपडे, अंथरूण-पांघरूण, कपड्यांची निवड इथपासून बारा वर्षं बिनातक्रार चालणारा फ्रीज, योग्यवेळी बदलायची भांडी, पडदे, चादरी अशा कितीतरी ठिकाणी तिचा हात लागला की ती वस्तू स्वच्छ होते, लखलखीत दिसते. सर्व घर सुरेख लागतं, स्वच्छ होतं. त्यावर फुलांच्या फुलदाण्या असतात. लहानशाच; पण तिनंच वाढवलेल्या कुंड्यांतून व अडचणी-ताणातून वाढवलेल्या सोसायटीच्या परसातली फुलं.
हे समोरचं डवरलेलं कडुनिंबाचं झाड म्हणजे आईच्या दहा-पंधरा वर्षांच्या संघर्षाचं प्रतीकच आहे. कितीजण त्या निंबाला तोडायला आले होते, किती विरोध- तरी आज हा परिसरात सावली, शुद्ध हवा देत उभा आहे; पक्षी येताहेत, अन् भोवताल हिरवा होऊन जातो.
अन्न हा तिच्यासाठी फार महत्त्वाचा विषय. कमीत कमी वस्तूत, स्वादिष्ट व पौष्टिक अन्न तयार करावं ते आईनंच. तिच्या हाताची चव तर आमच्या कुटुंबात व मित्रमंडळीत माहीत आहे. मसाले, झणझणीत बाजारी वस्तू यांची नावड ही तिच्याकडून माझ्यात आली. भाज्यांना, धान्याला त्यांची स्वत:ची चव असते. सर्व रस पोटात जावे, अन्न पौष्टिक असावे म्हणजे चविष्ट नसावं असं नाही. अन् चव ही वस्तू अमुक चमचे टाका, ती तितके ग्रॅम घ्या असं तयार होत नाही. जेवणारा आपला माणूस आहे. त्याच्यासाठी आपलेपणानं मन मिसळून केलेलं साधंच अन्न सुंदर होतं. हे तर मी लहानपणापासून अनुभवतो. तिच्या हातची ज्वारीची भाकरी, खोबऱ्याची चटणी अन् दूध किंवा दही. तिचं साधंसंच वरण, सुरेख भाज्या, चटण्या या देवदुर्लभ आहेत. साध्या पोळयाही कशा करायच्या, ताक करताना आलं, जिरं... वगैरे कितीतरी... अन् ते तेवढंच औषधी असतं- चविष्ट, औषधी.
तिच्या स्वयंपाकाचाच परिणाम म्हणून जे परंपरागत राहत आलं ते माझ्यासारखा जवळ जवळ मरणपंथाला गेलेला माणूस पुन्हा एकदा काम करतो. आयुर्वेदीय औषधांबरोबर तिचं अन्न रोगहारक आहे. ती स्वत: क्रॅन्सरसारख्या रोगातून बाहेर पडली ती ऑपरेशन व केमोथेरपीपेक्षा तिच्या अन्नामुळे. ज्या वेळी केमोथेरपी यातनांचा अंत पाहत होती व डॉक्टर दुसऱ्या ऑपरेशनचा आग्रह करत होते, त्या वेळी तिनं स्वत: निर्णय घेतला. यापुढे माझ्या शरीरात रासायनिक औषधं जाणार नाहीत. माझं काय बरं-वाईट होईल ते मी माझं पाहीन. शरीर माझं आहे.
अन् केमोच्या काळात तिचा वेदनेनं तळमळणारा देह पुन्हा उभा राहिला, केवळ तिच्या अन्नावर, अन् आयुर्वेदिक औषधांवर त्या औषधांचा ती पूरक म्हणून उपयोग करते. एक वर्षापूर्वी केमोथेरपीमुळे लुंजपुंज झालेली बाई स्व-बळावर व्यवस्थित घर राखते, स्वच्छ ठेवते, मोठ्या पोराला सांभाळते, दळण आणण्यापासून कापडं, वाणसामान आणते. मुलांना घरचे पदार्थ मुंबईला पाठवते नाराजी सहन करूनही.
आमच्या घरात दोन मोठे रोग सोडले तर सर्दी, ताप, डेंग्यू, चिकुनगुण्या आमच्या आसपासही फटकत नाही. याचे कारण म्हणजे भाज्या-डाळींनी परिपूर्ण अन्न व घरच्याघरी होणारे काढे व अन्य उपाय.
स्वत:ला व इतरांना उभं करण्याची तिची चिकाटी अजब आहे. दहावीला मेरिट लिस्टमध्ये आल्यावरही मेडिकलला न जाता आर्ट्सला जाण्याच्या, पुढे पत्रकार व नंतर नर्मदा संघर्षात जाण्याच्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी ती खंबीरपणे माझ्या मागे उभी होती. माझ्या मेडिकलला न जाण्यासाठी तिनंच रोष पत्करला. ``ताईच्या मुलासारखं झोळीवाला व्हायचं नाही बरं तू'' असं जवळचे नातेवाईकही मुलांना सांगत त्याकाळी.
नर्मदेला असताना आई घरात एकटी. त्याकाळात तिचं भावविश्व कोलमडलं होतं. पुन्हा पन्नाशीत घर उभं करायचं होतं- एकट्यानं. एकटं व्हावं लागलं हा जणू तिचाच अपराध असल्यासारखी जवळच्यांची दृष्टी तिनं कशी सहन केली. त्यातून पुण्यासारख्या ठिकाणी एकटं घर उभं करणं, सर्वांचं स्वागत करणं, मीही पाहुण्यासारखा येऊन जायचो. ती बडोद्याला, मणिबेलीला यायची, थकून, धापा टाकीतही आंदोलनांच्या कार्यक्रमात असायची. सर्वांचं कौतुक करणार, जेवू घालणार. अशा वेळी तिच्याशी किती कोरडेपणानं वागत होतो ते आठवलं की अपराधी वाटतं.
या काळात तिनं सर्वांची उस्तवारी केली, बाळंतपणं केली, इतरांनी विनवलं म्हणून कमीपणा घेऊन त्यांच्या लग्नासाठी प्रयत्न केले. सततच्या मानसिक ताणाचा तिच्यावर परिणाम झाला. स्वत:ला सर्दीपडसं होऊ न देणाऱ्या व्यक्तीला क्रॅन्सर झाला. केमोच्या वेदनादायक काळातही जवळच्या म्हणवणाऱ्यांनी बोटसुद्धा लावलं नाही; नातवंडांना तिला भेटू दिलं नाही. उलट काहींनी तर शाब्दिक हल्ले केले. ते सर्व सांभाळून ती उभी राहिली. नव्हे सतत काहीतरी नवं लिहीत राहिली.
कितीतरी वर्षांपासून ती लिहिते आहे. अगदी `आेंजळ' काव्य संग्रहापासून `मराठा'तले ललितलेख, पुढे `पुरुषार्थ विचार' व आता `मुक्ताई'वर प्रबंध, संत साहित्यावर स्फुटलेखन सततच असतं. सगळं करून झालं की ती खास बनवलेलं टेबल घेऊन लिहीत राहते- तिची दहा पुस्तकं आली- त्याची तेवढी दखल घेतली गेली नाही. संमेलनाला तिला बोलावत नाहीत. तरी तिचं लिखाण सुरू आहे. मलाही ती म्हणते, ``असं फुटकळ कारकुनीवजा किती लिहिणार, काही तरी तुझं, ठोस लिही.''
आज तिचे आमच्या आसपास किती संबंध आहेत? ती समोर भाजी आणायला जाईस्तोवर पाच-दहाजण भेटतात. बोलणं होतं, आमच्या आजोळच्या सर्व नातेवाइकांना जोडून ठेवलंय. ``माझ्याशी कुणी कसेही वागो; तू भावाबहिणींशी नीट वाग'' असा तिचा आग्रह असतो. समाजाच्या विविध स्तरांवर- कलकत्त्याच्या कुलगुरूंपासून, इथल्या प्रकाशकापासून मराठवाड्यातल्या लेखकांपर्यंत, मेहुणपासून ठाण्यापर्यंतच्या वारकरी भक्तांना, विद्वानांना ती माहीत आहे; जोडून ठेवते.
कोणतीही व्यक्ती निर्दोष नसते. मतैक्यच होतं असं नाही. तिची राजकीय, सामाजिक मतं ठाम आहेत. ती म्हणते, ``माझ्या अनुभवातून बोलते. तुम्हालाही अनुभव येईल. तोवर वेळ निघून गेली असेल.'' गांधींचं, तिला अप्रूपच आहे. समाजवादी प्रभावहीन आहेत असं तिचं निरीक्षण आहे. लहानपणापासून चांगले लेखक, उपनिषद- गीता, संस्कृत, मराठी-साहित्यिक वाचायला उद्युक्त करणाऱ्या आईला आंतरराष्ट्नीय भान आहे. बुश, मुशर्रफ हे तिच्या हसण्याचे विषय आहेत.''
ह्नह्नह्न

माझी आई

माझी आई कुठे आहे ?
माझी आई कुठे आहे ?
एक चिमुकले बाळ
फिरतसे गोल गोल
ह्या खोलीत, त्या खोलीत ?
घरभर शोध घेत
'ज्याला त्याला विचारते
आई गेली तरी कुठे ?
कुणी काही न बोलले
बाळ रडायला लागले
किती रडले रडले
खूप दमले दमले
तोच शब्द ऐकू आले
अरे, आंघोळीला गेले !'